रविवार, ७ जून, २०२६


 गावड्याचा आंबा...

शेताकडे जाताना वडाच्या माळावरून, देसाईच्या मोळाच्या विहिरीवरून आणि पाटलाच्या पडीवरून जरा वर आलो की नजर आपोआप ऐनाडीच्या दिशेने वळायची. त्या नजरेला सर्वात आधी दिसायचा तो डेरेदार, हिरवागार आणि रुबाबदार गावड्याचा आंबा. आज तो तिथे नाही; पण माझ्या स्मृतींच्या शिवारात तो अजूनही तितक्याच दिमाखात उभा आहे. 

१९९० च्या दशकात आमचं बालपण ज्या काही गोष्टींनी घडवलं, त्यात या आंब्याचा मोठा वाटा आहे. बापू आणि आंबाजी पाटील (गावडे) यांचं एकत्र कुटुंब असताना ऐनाडीतील त्यांचं शेत माझे वडील आण्णा यांनीच केलं होतं. त्यामुळे लहानपणापासून आण्णाच्या मागोमाग त्या शेतात जाणं, भूईमुगाच्या शेंगा तोडणं, कोळपा ओढणं, पेरणीची कामं करणं, भाताच्या ओफ्यात राबणं हे सगळं आयुष्याचा अविभाज्य भाग बनलं होतं. त्या काळी शेत म्हणजे फक्त जमीन नव्हती ; ती आमची शाळा होती, खेळाचं मैदान होतं आणि आयुष्याचे धडे देणारं विद्यापीठही होतं.

खरं सांगायचं तर त्या परिसराची ओळखच तो होता. दूरवरून आंबा दिसला की आपण योग्य वाटेवर आहोत, याची खात्री वाटायची. पिकं बदलायची, माणसं बदलायची, ऋतू बदलायचे; पण त्याने कधी आपली सेवा बदलली नाही. उन्हातान्हात राबणाऱ्या प्रत्येकासाठी तो कायम तसाच उभा राहिला.

विशेष म्हणजे त्याला फारसे चांगले आंबे लागायचे नाहीत. त्याच्या फळांसाठी कोणी त्याची आठवण काढत नव्हतं. पण त्याच्या सावलीवर मात्र संपूर्ण रान जीवापाड प्रेम करायचं. दुपारच्या कडक उन्हात भाकरीचा तुकडा खाण्यासाठी शेतकरी त्याच्याखाली यायचे. बैलांना बांधायचं असेल, म्हशींना विसावा द्यायचा असेल किंवा कामाच्या थकव्याने अंग शिणलं असेल, तर त्या सगळ्यांचा आसरा तोच. त्याच्या बुंध्याला टेकून घेतलेली डुलकी म्हणजे एखाद्या राजवाड्यातील विश्रांतीपेक्षा कमी नव्हती.

माझ्यासाठी तर त्या झाडाचं महत्त्व आणखी वेगळं होतं. १९९५ ते १९९८ या काळात दहावी आणि बारावीचा बराचसा अभ्यास मी त्याच सावलीत बसून केला. दादानेही त्याची दहावी त्याच झाडाखाली अभ्यास करून पूर्ण केली होती. त्यामुळे कदाचित आम्हाला तो आंबा लकी वाटायचा. पुस्तकं घेऊन जायचं, थोडा अभ्यास करायचा, कंटाळा आला की वरच्या पानांतून दिसणाऱ्या आकाशाकडे बघत बसायचं. कधी डोळे मिटले की बुंध्याला टेकून तासभर झोपून जायचं आणि पुन्हा उठून अभ्यास सुरू करायचा. आजच्या मुलांना वातानुकूलित अभ्यासिका मिळतात; आम्हाला त्या काळी गावड्याच्या आंब्याची सावली मिळाली होती. तीच आमची लायब्ररी होती, तीच आमची अभ्यासिका होती.

त्या आंब्याखाली फक्त अभ्यासच झाला नाही; तर आयुष्यही घडलं. शेतात राबणाऱ्या माणसांचं कष्टमय जगणं तिथेच पाहिलं. उन्हाची झळ काय असते, घामाची किंमत काय असते आणि माणसाच्या श्रमात किती मोठेपण असतं, हे नकळत तिथेच शिकायला मिळालं. कदाचित म्हणूनच त्या झाडाबद्दलच्या आठवणी मनात इतक्या खोलवर रुजल्या असाव्यात.

काळ पुढे सरकत गेला. कुटुंबांची समीकरणं बदलली. शेतांशी असलेलं नातंही हळूहळू सैल होत गेलं. आमचं त्या भागातलं जाणं-येणं कमी झालं. पण त्या आंब्याशी जोडलेला जीवाचा धागा मात्र कधी तुटला नाही. जेव्हा केव्हा त्या वाटेने जायचो, तेव्हा नजर आपोआप त्याच्याकडे वळायची.

मग एक दिवस तोही गेला..आज शेतं तीच दिसतात, वाटा त्याच दिसतात, वारा तसाच वाहताना जाणवतो; पण काहीतरी हरवल्यासारखं वाटतं. आण्णा गेला आणि शेत बोडकं झालं, अशी भावना मनात वारंवार येते. खरं तर फक्त आण्णाच गेला नाही; त्याच्यासोबत एका काळाच निघून गेला. त्या काळात गावड्याचा आंबा होता, ऐनाडी होती, लक्ष्मीची रांग होती. शेतात दिवसभर राबणारी माणसं होती. जगण्याला एक साधेपणा होता आणि नात्यांना एक ऊब होती.

आज त्या जागेकडे पाहिलं की झाड दिसत नाही. पण त्या रिकाम्या जागेतही मला त्याची सावली दिसते. त्याचा भला मोठा बुंधा दिसतो. त्याखाली भाकरी खात बसलेली माणसं दिसतात. उन्हातून दमलेले बैल दिसतात. शेजारच्या पाझर तलावाच्या कामासाठी आलेली माणसं दिसतात. पुस्तक हातात घेऊन बसलेला माझा लहानपणीचा चेहराही दिसतो.

नोकरीच्या निमित्ताने मुंबई गाठली. गाव मागे राहिलं. आयुष्याच्या धावपळीत अनेक गोष्टी बदलल्या. पण काही आठवणी अशा असतात की त्या आपला पाठलाग कधीच सोडत नाहीत. गावड्याचा आंबा ही त्यापैकीच एक आठवण आहे.

रानातून जाताना आजही नकळत नजर त्या दिशेने जाते. क्षणभर वाटतं, त्या हिरव्या गर्द सावलीत आण्णा बसला आहे... आई भाकरीची घडी उघडते आहे... आणि मी पुन्हा एकदा बालपणाच्या त्या दिवसांत हरवून गेलो आहे.

झाडं मरतात, माणसंही निघून जातात. पण काही सावल्या कधीच संपत नाहीत. त्या आठवणींच्या रूपाने आयुष्यभर आपल्या सोबत चालत राहतात.

गावड्याचा आंबा माझ्यासाठी केवळ एक झाड नव्हता; तो माझ्या बालपणाचा मुक साक्षीदार होता. माझ्या आयुष्यातल्या असंख्य क्षणांना त्याने सावली दिली, आसरा दिला. काळाने ते झाड हिरावून घेतलं, पण त्याची सावली अजूनही माझ्या मनावर तशीच पसरलेली आहे.

आणि कदाचित म्हणूनच, डोळे मिटले की आजही मला दूर ऐनाडीच्या दिशेला तो डेरेदार आंबा दिसतो... ताठ उभा... शांत... संयमी... माझ्या बालपणावर प्रेमाने सावली धरून.

काही झाडं रानात उभी असतात, तर काही मनात. गावड्याचा आंबा आता रानात नाही; पण माझ्या मनात तो अजूनही जिवंत आहे. 


-पवन होन्याळकर


सोमवार, १२ मे, २०२५


२९ वर्षांनी पुन्हा शाळेत... आठवणींच्या वळणावर एक भावस्पर्शी भेट


 कधी वाटायचं – इतकं वर्ष झाल्यावर आपण परत एकत्र जमू का? कुणाला वेळ असेल का? कोणी प्रतिसाद तरी येईल का? पण गेल्या चार महिन्यांत अनेक जणांनी मनापासून घेतलेले कष्ट, ग्रुपमधील चर्चांचे सतत सुरु असलेले थ्रेड्स, अनेकांचे सल्ले देणारे मेसेज – हे सगळं एका सुंदर क्षणात परिपूर्ण झालं. ११ मे २०२५, रविवार – आप्पासाहेब गायकवाड हायस्कूल, महागोंड – *१९९५-९६च्या दहावीच्या बॅचचा गेट टुगेदर* *. केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर पुन्हा एकदा वर्गातल्या त्या आठवणींनी ओथंबवणारी भेट होती.

नव्या शाळेच्या गेटपाशी पाय ठेवताच सगळं मनातलं थांबून गेलं. जुनी इमारत आठवणीत उभी होती,  पण या वेळी तिची  केवळ आठवण होती. पण समोर नवीन शाळा होती. स्वागताला असलेली रांगोळी.. त्यानंतर रंगीबेरंगी फुग्यांचे सुंदर आरास.. शाळेत पाय ठेवताच

वर्गाबाहेर मोठा बॅनर झळकत होता – त्यावर आमच्या सगळ्यांची नावं आणि एक जुना रंगीत फोटो – ९ मार्च १९९६ चा निरोप समारंभाचा. तो फोटो पाहून अनेकजण तंद्रीत गेले – कुणी हसत होतं, कुणी आठवणी थांबवू पाहत होतं, तर कुणी नजरेतून भावना व्यक्त करत होतं. हा बॅनर गेट टुगेदरचं एक खास आकर्षण ठरला. त्या बॅनरपाशी उभं राहून वाटलं – त्या काळातील आम्ही! जो तो.. त्यावेळी ओळखीचा पण आता अनोळखी वाटत होता.  अनेकांनी त्यासमोर उभं राहून फोटो घेतले,  तर काहींनी डोळे मिटून त्या काळातलं स्वतःचं प्रतिबिंब शोधण्याचा प्रयत्न केला. त्या दिवसांपासून आताच्या जबाबदारीच्या टप्प्यापर्यंतचा प्रवास केवळ आठवणींच्या बॅनरवर नव्हे, तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटला होता. एकीकडे काही जण ओळखी बदलून गेले होते. कुणाचे केस गळले, कुणी चेहऱ्यावर आठवणींच्या रेषा घेतल्या – पण हास्याचा आवाज मात्र तसाच होता. २९ वर्षांनंतर, एकूण ३६ सहपाठी – २४ मुले आणि १२ मुली – पुन्हा एकत्र जमलो होतो.  २९ वर्षांनी एकत्र आल्याचं समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत होतं.

...कार्यक्रमाचा एक विशेष क्षण म्हणजे "जुन्या आठवणींचा प्रयोग प्रत्यक्षात घडवून आणणं."

कार्यक्रमाची सुरुवातच एक झणझणीत भावनांचा तडका घेऊन झाली. शाळेची  घंटा पुन्हा वाजवण्यात आली. त्याचा आवाज ऐकून अनेकजण स्तब्ध झाले. त्या एकाच आवाजाने शाळेतील सगळ्या आठवणी पुन्हा जिवंत झाल्या. सर्वांचे स्वागत झाले.

जेव्हा शिक्षक मंचावर आले,  तेव्हा बाळाने अगदी मनापासून – आवाज दिला, *" ऑल ऑफ स्टॅंड अप!"* क्षणात सगळे उभे राहिले आणि वर्गभर एकसूरात पुन्हा तो आवाज घुमला: *"गुड मॉर्निंग सर!"*

माजी मुख्याध्यापक एस. के. पाटील सर, सध्याचे मुख्याध्यापक दीपक कांबळे सर, तेव्हाचे वर्गशिक्षक बी. जी. घाटगे सर, एस. एस. पाटील सर, ए. बी. दिवटे सर, आर. एस. सुतार सर सर्वजण क्षणभर स्तब्ध झाले. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान, आश्चर्य आणि एक अनामिक गर्व स्पष्ट दिसत होता. हा क्षण म्हणजे गेट टुगेदरचा सर्वोच्च बिंदू होता – कारण तो 'आठवण' नव्हती, तर 'पुन्हा जगलेली' भावना होती.

नंतर सर्व शिक्षकांचे  अगदी संभाने मनभरुन स्वागत केलं. आमचाच वगमित्र नामा आणि आमचे शिक्षक आर. एस. सुतार सर यांनी प्रार्थना घेतली. तेव्हा खूपजणांच्या अंगावर काटा आला. यानंतर प्रास्ताविक मी केले. 

शेवटच्या बाकावरील मानसिंग येजरे आज आपल्यात नव्हता. त्याचं निधन झालं. त्याच्यासाठी आणि आपल्या देशासाठी शहिद झालेल्या सैनिक तसेच ज्ञान अज्ञातांसाठी मौन पाळलं. श्रदधांजली वाहिली.

कार्यक्रमाचं सूत्रसंचलन सागर सावंतने केलं – आणि त्याने सुरुवात करताच आठवणींचा पूर उसळला. एखादा खोडकर किस्सा, शिक्षकांच्या अनेक आठवणी सांगत त्याने कार्यक्रमाची सूत्र अगदी खिळवून ठेवली. शाळेतील खोड्या, किस्से – एकामागून एक वलय उलगडत गेलं. त्याने आठवणींची अनेक आठवणी उलघडल्या.

या गेट टुगेदरला  शिक्षकांची उपस्थिती ही पर्वणी ठरली. माजी मुख्याध्यापक एस. के. पाटील सर, सध्याचे मुख्याध्यापक दीपक कांबळे सर, वर्गशिक्षक बी. जी. घाटगे सर, एस. एस. पाटील सर, ए. बी. दिवटे सर, आर. एस. सुतार सर, तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी सातु अण्णा, अदिनाथ बुवा, विजय कुंभार सर्वांना मनापासून निमंत्रण दिलं गेलं होतं आणि त्यांच्या उपस्थितीने गेट टुगेदरला एक वलय मिळाले. सर्व सरांनी मार्गदर्शन केले. त्यांनी प्रत्येकाचे कौतुक केले व नियोजनासाठी सर्वांची पाठ थोपटली.. 

एस. के पाटील सरांच्या गणिताच्या तासातली शिस्त, पाटील सरांच्या मराठी व्याकरण, दिवटे सर घेत असलेली उजळणी – सगळं पुन्हा चर्चेत आलं. पण या आठवणींमधून केवळ हशा नाही, तर आदरही होता – कारण याच शिकवणीने आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं. शाळेच्या आठवणींमध्ये प्रत्येक शिक्षक एकेक अध्याय होता. प्रत्येकाने आम्हाला फक्त विषय शिकवले नाहीत, तर जगण्याची दिशा दिली. सर्वांनीच आपला परिचय करुन दिला यांनतर संभाजी, वैभव, मी, अनिल व प्रत्येकाने आपापले अनुभव शेअर केले. भिकूताईच्या मुलींची शासकीय सेवेतली वाटचाल पाहून अनेकांना अभिमान वाटला. जुन्या सहपाठींची प्रगती, जिद्द, संघर्ष यांचं कौतुक झालं. तो" *ऋणानुबंध मैत्रीचे – २९ वर्षांचे"* अशी स्मृतीचिन्हं देण्यात आली.

दुपारनंतर सर्वजण निसर्ग हॉटेल उत्तूर मध्ये एकत्र जेवणासाठी जमले. महादेवने वाहनाची  सोय चांगली केली होती.  


सर्वांच्या मनात एक सूर होता – "हे शेवटचं नसावं!"

केवळ फोटो काढणं, मेसेज टाकणं इतपतच मैत्री नको – तर या गेट टुगेदरचं पुढे चालणारं पाऊल व्हावं. शाळेसाठी काही तरी करायचं, काही सुधारणा – आणि दर ३ ते ५ वर्षांनी तरी अशीच भेट ठेवायची, असा ठाम निर्धार झाला.


आणि हो...

सागर, बाळा,  अतुल,  मुकेश,  संभाजी,  वैभव,  शशिकांत,  मानसिंग,  धनाजी,  निलेश,  रत्ना, मनिषा,  कविता,  अमर,  राजाराम,  जोतिबा,  नामदेव,  महादेव – आणि उपस्थित असलेले *सर्वजणच* – यांच्यामुळेच हे शक्य झालं.


*"पुन्हा भेटूया"* एवढंच नव्हे – तर ठरवलं आहे की आता शाळेला शक्य ती मदत करायची, आणि अशाच आठवणींचा सोहळा दर काही वर्षांनी जपायचा.


*-पवन होन्याळकर,  १२ मे २०२५*

x

शनिवार, २६ जून, २०२१

आंबेओहळ प्रकल्पाचे घोडे गंगेत न्हाले...

 

आंबेओहळ प्रकल्पाचे घोडे गंगेत न्हाले...

तब्बल ३० वर्षाहून अधिक रेंगाळलेला आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) अखेर मार्गी लागला असे म्हणायला हरकत नाही. जून मध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे या प्रकल्पात पाणी साठ्यास सुरुवात झाली याचे समाधान वाटते. तत्कालीन आमदार बाबासाहेब कुपेकर यांनी हे धरण उभारण्याचे स्वप्न पाहिले ते सत्यात उतरले. उत्तूर परिसरील शेतीही पावसावरच, तो पडला की शेती पिकते नाहीतर मग काहीच नाही. हिरण्यकेशी नदी अथवा अन्य कोणत्याही पाण्याचा उपयोग या परिसराला झाला नाही. गेली कित्येक वर्ष या विभागातील सर्वच खेडी पिण्याच्या पाण्यासाठी विंधण विहिरीवरच आहेत. शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी आंबेओहळ प्रकल्पाचा विचार केला. या प्रकल्पाचे सर्व्हेक्षण सन ८० ते ९० च्या दशकात झाले अशी त्यावेळी चर्चा रंगायची.. कृष्णा खोरे लवाद मंडळाच्या निवाड्यानुसार मंजूर झालेला हा ७ टीएमसी प्रकल्प म्हणून या प्रकल्पाकडे त्यावेळी पहायले जायचे. सन २००० सालापासून या प्रकल्पाला गती निर्माण झाली. आंबेओहळची जागा  कोणती तर कर्पेवाडीच्या जवळ असलेली नेमकी जागा लोकांना समजली आणि सरकारची वाहने त्या ठिकाणी येवू लागली. या प्रकल्पाने पाणी उपलब्ध होणार असले तरी आठ दहा खेड्यातील चांगल्या प्रतिची जमीन बुडणार असल्याने पहिल्यापासूनच शेतकर्यांचा या प्रकल्पाला तीव्र विरोध होता. गेल्या तीन चार वर्षापासून मात्र हा प्रकल्प पुन्हा शासनाने विचारात घेतला.  पुनवर्सन आणि सरकारने केलेले दुर्लक्ष यामुळे या प्रकल्पाला विरोध झाला. यामुळे प्रत्यक्षात सुरुवात होण्यास अडचणी आल्या. गेल्या काही वर्षात हा प्रश्न मार्गी लागला.
पोलीस बंदोबस्तात घळभरणी झाली त्यावेळीही शेतकरी व प्रकल्प संघटनेने आंदोलने केली. आता या  आणि प्रकल्पात पाणी साठले.. अनेक पुर्नवर्सनाचे प्रश्न अनेक मागे आहेत. शेतकर्यांचा अक्रोश कायम आहे. अजूनही काही शेतकर्यांना मोबदला मिळाला नाही अशा तक्रारी आहेत. प्रकल्पात पाणी साठा झाल्याने उत्तूर आणि गडहिंग्लज परिसर सुजलाम सुफलाम होणार असला तरी  जमीन देणारे शेतकर्यांना मात्र वार्यावर सोडू नये हीच अपेक्षा.. 


....................................................................................................................................................................

आंबेओहळ प्रकल्प मार्गी लागला आणि मी महागोंड बातमीदार म्हणून काम केलेली आठवण झाली.. या प्रकल्पाच्या सुरुवातीला २००० मध्ये अनेक बातम्या करण्याचा योग आला.. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मांडण्याचे प्रयत्न केले होते. ते दिवस पुन्हा आठवले.. त्या वेळची एक मिळालेली बातमी...

शनिवार, ८ मे, २०२१

 कोरोना रुग्ण आणि नातेवाईकांना जेवणाचा डबा देणारा बाळा भोसले...

आपल्याच गावातील गडहिंग्लज मध्ये कोरोना उपचारासाठी दाखल झालेल्या कोरोनाबाधीत रुग्ण आणि नातेवाईकांना जेवण कोण देणार हा प्रश्न मला पडला. हा आजारच असा आहे की, संसर्गाचा धोका अधिक मग आपल्या गावात असलेल्या कोरोनाबाधितांना जेवण देण्याचे काम गडहिंग्लजमध्ये नव्याने सुरु केलेल्या ताव फॅमिली रेस्टॉरंटचे मालक बाळा भोसले (गाव महागोंड) करत आहेत.  

कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा भयंकर आहे. यात कोरोनाची लागण होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच माझा गाव सापडला असे बाळा भोसले सांगत होते. या लाटेत मात्र अनेकांना जीव गमवावा लागला. अगदी जवळची माणसे सोडून गेली. काहींचं संपूर्ण कुटुंब कोरोनाबाधित झालं. त्यांच्या घरी डबे करायला कोणी नाही. अशा माझ्या गावातील रुग्ण व त्याच्या सोबत राहणार्याला जेवण देण्याचा निर्णय घेतला. गडहिंग्लज मध्ये मी हॉटेल नव्याने चालू केले, केवळ २० दिवसच हॉटेल चालू राहिले. लॉकडाउन झाले आणि हॉटेल बंद ठेवावे लागले. ही अडचण असली तरी रुग्णांची सेवा करायची आहे म्हणून मी निर्णय घेतला. गावात कोरोना झालेल्या आणि गडहिंग्लजला उपचाराला आल्यावर चौघांना जीव गमवावा लागला मात्र अनेक बरे होवून घरी गेले याचे समाधान आहे. 

या महामारीत अनेकांचे जेवणाचे हाल होत आहेत. माझ्या गावातील कोणी जेवनावाचून राहू नये, त्यांना मदत करायला हवी माझे पार्टनर संदीप याबाबत चर्चा केली त्याने देखील लगेच होकार दिला. मग आम्ही ही सेवा सुरु केली. हे काम सुरू करण्यामागे एकच भावना होती ती म्हणजे माझ्या माणसांचे हाल व्हायला नको. दोन घास देण्यासाठी माझ्याकडून जोपर्यंत शक्य होईल तोपर्यंत हे मी करत राहील. असेही बाळा भोसले सांगतात. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून त्यांनी याबाबतची माहिती लोकांपर्यंत पोहचवली. अनेकजण पैसे घेण्याचा आग्रह करतात पण मी घेत नाहीत. आपल्याला सेवा करण्याची गरज आहे. गरजूला मदत करता येत असल्याचे समाधान असेही सांगतात.

बुधवार, १ जुलै, २०२०

आठवणीतील पाटील सर !


.जी. हायस्कूलचे मुख्याध्यापक एस.एस. पाटील सर हे सेवानिवृत्त झाले. ज्या शिक्षकांनी मला आठवी ते दहावी ही तीन वर्षे मला घडवली. त्यामधील पाटील सर हे एक. सरांचा निरोप समारंभ झाला. कोरोनाच्या पाश्वभूमीवर हा समारंभ छोटखानी झाला. मला फोटो आले. आणि मी तब्बल २६ वर्षाचा काळ मी मागे गेलो. १९९६ ला मी दहावी पार केली. आणि पुढील शिक्षणासाठी पुढे आजरा तालुक्याच्या ठिकाणी गेला. १९९४ ते १९९६ हा काळ आयुष्यातील शैक्षणिक आणि महत्वपूर्ण टप्पा.  दिलखुलास शिक्षक म्हणून पाटील सरांची खास ओळख. नेहमी हसतमुख, साधे आणि सरळमार्गी माणूस. गावातील ग्रामपंचायतीच्या जवळच्या जुन्या इमारतीत आमचे शिक्षण झाले. हायस्कूलमध्ये आठवीच्या वर्गात पाय ठेवायच्या अगोदरच मला बहुतांश सर्व शिक्षकांची सुतार सर, घाटगे सर, दिवटे सर यांची ओळख होती. पाटील सर त्याहून अधिक काळापासून म्हणजे हॉटेलात (हॉटेल हा विषय मी कधीतरी पुढे लिहीन) येत असल्याने ते ओळखीचे होते. सर मराठी आणि इतिहास विषय शिकवायचे. मला मराठी विषय आवडायचा पण इतिहास जरा अधिकच डोके खाणारा विषय मला वाटायचा. पाटील सर हे कधीच फळ्याजवळ राहून शिकवत नव्हते. फळ्याचा उपयोग ते फारसे करत नसत. केवळ मराठी व्याकरण शिकवत असतानाच ते फळा वापरत. ते नेहमी सर्व विद्यार्थ्यांवर नजर राहावी या हेतूनच वर्गाच्या बरोवर सुरुवातीच्या टोकावर उभे राहून शिकवायचे. मराठी आणि इतिहास या दोन्ही विषयावर त्यांचा खूप पगडा होता. मराठी विषयात धडा शिकवताना ज्या लेखकाने धडा लिहला आहे. त्या लेखकाची माहिती किंवा व्यक्ती विशेष किंवा अन्य काही अभ्यासाव्यतिरिक्त विषय निघाल्यास अधिकाधिक माहिती आपल्या विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी ते धडपड करीत. त्यासाठी त्यांचा निम्मा तास गेला तरी ते कधी मागे हटत नसत. विद्यार्थ्यांचे वर्गात लक्ष नाही असे त्यांच्या लक्षात आल्यानंतर तर त्याला लगेच ते उभे करत, आपण सांगितेली माहिती ते विचारत. ग्रामीण धडा असो किंवा एखादे व्यक्ती विशेष ते रमून शिकवत असत. कविता शिकवताना तर ते त्या कवितेत ते भान हरपून जायचे. कविता गाऊन शिकविल्या आणि चालीतून शिकविली तर कळते हे त्यांचे कायमचे वाक्य. इतिहास हा विषय कंटाळवाना इतिहासातील घटनांचा अभ्यास, शेकडो, हजारो वर्षांपूर्वी घडून गेलेल्या घटनांचे स्वरूप अत्यंत गुंतागुंतीचे असते. त्या सनावळ्या, इतिहास कालीन घटना, काही वेळा धड्यातील एकद्या घटना स्पष्ट नसतात त्या उलगडून काही पुरावे देत आणि गंमती जमंती करत ते शिकवत असत. एकादा धडा शिकवताना अगदीच समोरचे विद्यार्थी कंटाळवाने झाले असतील. ते मध्येच विद्यार्थ्यांच्या नावानेच विनोद करायचे. इतिहासाचे अध्ययन-अध्यापन महत्त्वाचे आहे. असे सांगत ते धड्याचा उलगडा करायचे.
पाटील सर.. तब्बल २६ वर्ष मला वर्गात तुम्ही नेले. बाकावर बसवले आणि आठवणी जाग्या केलात. शैक्षणिक आयुष्य खूप सुंदर आहे. त्या काळात मोठे होण्याची ओढ असते. त्याच काळात तुम्ही शिकवले. घडवले.
अनेकांना तुम्ही शिकवलेल्या विषयाला स्कोरींग मिळाले. काही वर्ष तुम्ही मुख्याध्यापक म्हणूनही शाळेत काम केले.
आता कित्येक वर्षाची सोबत असलेला फळा खडू सोडून तुम्ही निवृत्त झालात. तुमच्या पुढील आयुष्याला शुभेच्छा!


सोमवार, २९ जून, २०२०

पेरणीनंतर पाऊस झाल्यानंतर उघडीप


पाऊस खूप पडला,
बीज तरारून आलं..
आकांक्षांना कोंभ फुटले..
इवली इवली हिरवी पाने 
उद्या दोन घास पदरात देतील.
शेतकऱ्याच खळ सार अखंड भरून जाईल..

छाया ः रोहित पाटील...

रविवार, २८ जून, २०२०

दिलदार मनाचा मोठा माणूस

माझे मित्र उत्तूर सकाळचे बातमीदार अशोक तोरस्कर यांच्या पत्रकारिता प्रवासाला २५ वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्ताने  त्यांच्या विषयी अनेकांनी  मते   'डेटलाईन उत्तूर'  या पुस्तकात व्यक्त केली आहेत. त्या पुस्तकातील त्यांच्या विषयाचा  दिलदार मनाचा मोठा माणूस माझा लेख जसा आहे तसा..

तसं पाहिले तर त्यांच्या आणि माझ्यात वयाचे खूप मोठे अंतर असतानाही त्यांनी मला कधीच जाणवू दिले नाही. त्यांच्या पत्रकारितेला २५ वर्षे होत आहेत. त्यापैकी २० वर्षे त्यांचा माझा अगदी जवळचा संबंध आहे. मी बातमीदारीचा प्रवास माझे गाव महागोंड त्यानंतर उत्तूर आता मुंबईत असलो तरीही मैत्रीत कधी खंड पडलेला नाही. जशी आहे तशी आजही त्यांनी मैत्री टिकवली आहे. त्यांच्या पत्रकारितेतून प्रेरणा घेऊनच मी पत्रकारितेत आलो. हा प्रवास मांडताना मला थोडं अधिक मागे जावेच लागणार आहे. अकरावी-बारावीचे शिक्षण आजरा येथे घेतल्यानंतर पदवी शिक्षणासाठी मी गडहिंग्लजला अॅडमिशन घेतले आणि त्यामुळे उत्तूरचा संपर्क अधिकच झाला. गडहिंग्लजला जाताना उत्तूरला थांबण व्हायचे आणि त्यातूनच माझा अशोकरावांशी संबंध आला... (ते माझ्यापेक्षा बरेच वर्षानी मोठे आहेत. मात्र आदरार्थी या भावनेने मी अशोकरावच म्हणेन) पत्रकारितेच्या माझ्या पुढील करिअरला दिशा अधिक त्यांनीच दिली. त्यांच्या सोबत राहून ते कसे काम करतात हे मला
अगदी सारखे वाटायचे. पेपरला बातमीसोबत बातमीदाराचे नांव येणे हे माझ्यासाठी खूप अप्रूप असायचे. त्या ओढीने मी अशोकरावांच्या एस.टी.डी.मध्ये जावून बसू लागलो आणि तेथून माझ्या आणि अशोकरावांच्या मैत्रीला प्रारंभ झाला. तो काळ १९९९ चा त्यानंतर मार्च २००० मध्ये सकाळचा महागोंड बातमीदार म्हणून माझी निवड झाली. ते आणि मी अनेकदा स्पर्धक दैनिकात बातमीदारी करत असलो तरी त्यांनी कधी आकस आणि शत्रूत्व ठेवले नाही. नव्या आलेल्या पत्रकारांना पुढे कसे पुढे नेता येईल हे त्यांनी पाहिले. बदलत्या काळानुसार पत्रकारिता बदलत गेली. नोकरी आणि पुढील पत्रकारिता करियरसाठी मी मुंबईला आलो. तरी त्यांनी माझ्या सोबत जपलेले दायीत्व आजही कायम ठेवले आहे. त्यांच्या पत्रकारितेच्या काळात त्यांनी उत्तूर विभागातील घडलेली अनेक स्थित्यंतरे जशी पाहिली, तशीच त्यांच्या पत्रकारितेतील अनेक चढउतारही अनुभवले. त्यांनी मला सुरूवातीला घडवलेल्या पत्रकारितेची प्रेरणा घेऊन मी माझ्या पत्रकारितेतील वाटचाल पुढे चालू ठेवली आहे. बातमीदारीच्या प्रवासातील निगर्वी सोबती म्हणूनच ते आजही आहेत. उत्तूर परिसरातील अनेक प्रश्न आपल्या लेखणीतून मांडणारा दिलदार मनाचा माणूस असेच मी त्यांचे वर्णन करीन. आपल्या लिखानातून अनेक विधायक बाबींना ते नेहमी उजेडात आणतात. त्यांचे प्रत्येक बातमीत वेगळेपण आहे. व्यक्ती निरीक्षण त्यांच्याकडे अफाट आहे. प्रत्येक व्यक्तीचे निरीक्षण हुबेहुब लेखणीतून मांडणे हे त्यांचे कौशल्य आजही मला भावते. एखादी दुःखद बातमी मोठी देण्यापेक्षा विधायक बाजू मांडणारी बातमी आपल्या वाचकापर्यंत कशी पोहचेल हे ते नेहमी पाहतात. क्राईमच्या बातमीतही ते नेहमी उजवे असत. त्यांचा संपर्क अफाट असल्याने त्यांना परिसरात काय झाले की लगेच त्यांच्यापर्यंत पोहचत. अनेकदा त्यांनी माझ्या वैयक्तीक जीवनात मार्गदर्शकाची भूमिका निभावली आहे.
राजधानी मुंबईत बातमीदार म्हणून काम करताना मला कधी अशोकराव सारखा पुन्हा बातमीदार मित्र भेटला नाही. २० वर्षाचा काळ लोटला असला तरी ते दिवस आजही आठवतात. मानधन शेकड्यात मिळायचे म्हणून त्यांनी अनेकदा मला त्याकाळी अनेकदा धीर दिला. आयुष्यातील कॉलेज करत असताना नोकरी मला त्यांनी त्यांच्या एस.टी.डी.मध्येच दिली. त्यांच्या सोबतीने उत्तूर प
रिसरात तीन वर्षे काम केले. त्यांच्या संपर्कामुळे माझा अधिकचा बातमीदारीतील संपर्क झाला. सध्या मुंबईत असलो तरी अशोकरावाच्या सोबतीने काम केल्यामुळे उत्तूरातील मंडळी आजही ओळखतात. ग्रामीण भागातून आलेल्या बातमीदारांना एक वलय देण्याचे
मोठेपण हे कमी लोकांकडे असते. त्यांच्या सडेतोड, विधायक, सामाजिक बांधिलकी, सत्य आणि संवेदनशील पत्रकारितेमुळेच त्यांचा गेली २५ वर्षे दबदबा आहे तो असाच कायम रहावा हिच शुभेच्छा...!
-पवन होन्याळकर


शुक्रवार, २६ जून, २०२०

कोरोनाचा लढा पार केला...

२२ मार्चला मी ऑफीसला गेल्यानंतर पुन्हा ऑफीसला गेलो नाही. सर्व काही वर्क फ्रॉम होम सुरुच होते. मार्च, एप्रिल महिन्यात घरात लागणारे सामान खरेदी. कधी कामानिमित्त सोसायटीच्या ऑफीसमध्ये इतकाच काही तो माझा बाहेरचा संपर्क. मला कोरोनाची लागण होईल हे मला कधी वाटलेच नव्हते. हा आजारच कसा कुणाला गाठेल ही कल्पना करु शकणार नाही. त्याने मला हेरलंच. मी मानसरोवर (कामोठे) येथे राहत असल्याने या भागात रुग्णांची संख्या अधिकच होती. दिवसागणिक आकडा हा वाढतोय ते अजून चालूच आहे. दररोज १० हून अधिक रुग्ण या परिसरात सापडतात ते मुंबई व इतर ठिकाणी कामावर गेलेले. मी राहतो त्या सोसायटीच्या आजूबाजूच्या सोसायटीमध्ये मुंबईला कामानिमित्त जाणारे रुग्ण सापडतच होते.  २५ मे या दिवशी माझ्या सोसायटीमधील दोघेजण पॉझीटीव्ह निघाले. पण त्यांचे आणि माझे वयक्तीक संबध चांगले पण या काळात थेट त्यांच्याशी संपर्क आला नाही. त्यांचे खासगी चाचणीत रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याचे  मला कळल्यावर पनवेल पालिका प्रशासनाची बोलून त्यांना उपचार कसे व्यवस्थित मिळतील यासाठी मी त्या दिवशी बिल्डींगच्या खाली उतरलो. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार त्यांच्यासाठी काय सोय होईल. त्यांना लवकर उपचार कसे मिळतील यासाठी प्रयत्न होता. पालिकेचे कोणी कर्मचारी आले तर त्यांना सांगण्यासाठी मी तिथे होतो.दुपारचे १२.३३ झाले होते. पनवेल पालिकेच्या आरोग्य विभागाची रुग्णवाहिका आल्या. ज्यांना लागन झाली आहे. उपचारासाठी घेवून गेले. घरच्यांना इंडिया बुल्स मध्ये कॉरटाईंन केले. त्याच दिवशी (२५ मे) रात्री अचानक मला कणकण आली. रात्री ताप भरला. मी पॅरोसीटीमॉल घेतली आणि झोपलो. दुसर्या दिवशी मी सकाळी मंगळवार होता. तर कामोठे आरोग्य विभागाचे डॉ. संदीप पाटील यांना फोन केला. तर त्यांना मला सांगितले आरोग्य केंद्रात या. आरोग्य केंद्रावर त्यांनी मला आता तापाच्या आणि सर्दी खोकला टॅबलेट आदी सिरप दिले. ते बोलले हे औषध चालू करा.. काळजी करु नका थोडे व्हायरल असेल. त्यांना बोललो. आमच्या सोसायटीत दोघे काल सापडले आहेत. पण त्यांचा माझ्याशी थेट संपर्क आला नाही. डॉक्टर पाटील बोलले त्याचा काही संबध नाही. परिणाम लगेच होत नाही. पटकन ताप येणार नाही. तुम्ही काळजी करु नका वातावरण बदलले आहे. याचाही परिणाम असेल. मी त्या दिवशी ऑफीसला चार बातम्या पाठवल्या. परत त्या रात्री थोडी कणकण होतीच पण मी टॅबलेट घेवून झोपलो. बुधवारी (२७ मे) सकाळी मला थोडे बरे वाटले. मी नेहमी प्रमाणे दिवसभर काम केले. त्या दिवशी दिवसभरात घडामोडी जास्त होत्या. मी सात बातम्या ऑफिसला पाठवल्या. परत रात्री १०० ताप भरला. मी त्यावेळी मात्र घाबरलो. गुरुवारी डॉ. पाटील यांना परत कॉल केला. सर ताप काही कमी नाही आपण टेस्ट करुया का? ते बोलले पालिकेच्या वतीने करायची झाल्यास तुम्हाला इंडिया बुल्स मध्ये कॉरटटाईन व्हावे लागेल तीन दिवस जातील. तुम्ही अगोदर CBC, WITH ESR टेस्ट करा. ताप कसा येतो हे त्यांनी विचारले. मी म्हटले. मला थंडी वाजून ताप येत होता. मलेरिया टेस्ट करुन पाहूया. असे बोलले. तीही टेस्ट मी केली. तो रिपोर्ट संध्याकाळी आल्यानंतर नॉर्मल आला. मलेरियाही नाही. त्यामुळे पुन्हा चिंतेत पडलो. त्याच रात्री मात्र खूपच ताप आला होता. तापाची टॅबलेट मी त्याच रात्री दोन वेळा खाली तरी ताप कमी आला नाही. अखेर सकाळी मी डॉक्टरांना फोन केला. मी आता थांबू नाही शकत कोरोनाची टेस्ट करुया. मला काही केल्या ताप कमी येत नाही. चार दिवस ताप येत होता जात होता. या दिवसात केवळ तापच होता. बाकी मला ना सर्दी, ना खोकला किंवा चव न जाणे असे काहीही नव्हतेच. याचवेळी मी माझे मित्र डॉ. निकम सर यांच्याशी संपर्क साधला त्यांनाही मी सीबीसी रिपोर्ट पाठवला. त्यांनी मला तापाच्या गोळ्या बदलून टॅब दिल्या. तरीही ताप उतरच नव्हता ताप कमी येत नाहीत तर पवन तू टेस्ट कर. त्याच गुरुवारी रात्री मी निर्णय घेतला की आता बस उद्या शुक्रवारी टेस्ट करायची. सहसा मला फारसा ताप कधी येत नाही. दहा वर्षापूर्वी २०१० मध्ये मला कावीळ झाली होती. पण त्या भयंकर कावीळला मी तोंड दिले होते. त्यावेळी मला ताप आला होता. त्यानंतर मला कधी ताप आला हे आठवत नाही. सर्दी, खोकला असायचा पण कधी ताप फिरकला नाही. पण या आठ दिवसाच्या काळात तापाने चक्क मी गळून पडलो.

  •  रिपोर्टची प्रतिक्षा जीवघेणी

मी त्रासदायक तापाने अगोदरच वैतागलो होतो. जी मनात गेले पाच दिवस भिती घर करुन होती. ती कोरोना टेस्ट करावी लागणार होती. अनेकांनी सल्ला दिला की ताप कमी येईल. टेस्ट नको. तूला कोरोना नाही. जो काही त्रास गेले सहा दिवस होत होता. ते माझे मलाच माहित. मेट्रो पॉलिसीचा प्रतिनिधी घरी आला त्याने माझे स्वॅब दुपारी १२.३० वाजता शुक्रवारी (२९ मे) रोजी नेले. शनिवारी संध्याकाळी तुमचा रिपोर्ट येईल असे सांगितले. आता रिपोर्टची वाट पाहणे आणि आलेला ताप घालवणे इतकेच माझ्या हाती होते. शनिवारचा संध्याकाळ गेला रिपोर्ट काही आला नाही. रविवारी सकाळी त्या प्रतिनिधिला फोन केला. सर रविवारी सकाळी येईल. रविवारी सकाळी केला. संध्याकाळी येईल. या जीवघेण्या प्रतिक्षेने मी हैराण झालो. या काळात तापाबरोबर मला मेट्रो पॉलिसीच्या यंत्रणेने मला खूप त्रास दिला. माझा रिपोर्ट येत नव्हता. का येत नाही याचे नेमके कारण सांगितले जात नव्हते. अंगात १०१ ताप, रिपोर्टची प्रतिक्षा, घरी पत्नी रेश्मा, ९ वर्षाचा लहान मुलगा देवांशू हे माझ्या जवळच असायचे यामुळे मला अधिकच टेन्शन आले होते. रिपोर्ट कधी येईल मला उपचार कधी सुरु होतील. ताप कधी कमी येईल. हीच चिंता लागून राहिली होती. सोमवारी सकाळी मला मेट्रो पॉलिसीकडून कॉल आला. काही तांत्रिक अडचणी आल्या आहेत. त्यामुळे तुमचा रिपोट दोन दिवस पुढे जाईल. याचवेळी त्यांची आणि माझी खूप बाचाबाची झाली. तुम्ही अगोदर सांगितले पाहिजे होते. तसेच माझा भाऊ बाळासाहेब , साडू देवरकर दादा, मित्र पंकज बाबर यांनीही मेट्रो पॉलिसी वाल्यांनाही कॉल करुन हैरान केले. सोमवारी १ जून रोजी अशी अवस्था होती की, इकीकडे ताप आणि दुसरीकडे रिपोर्ट नाही. खाजगी रुग्णालयात चौकशी केली तर कोरोनाचा रिपोर्ट निगेटीव्ह असेल तर उपचार करु. त्या दिवशी मला थोडा खोकला पण येवू लागला. जीवघेणी अवस्था होती. या काळात सोसायटीतील अनेकांनी आधार दिला. सर्वांना माझा रिपोर्ट कधी येणार हीच चिंता होती. मेट्रो पॉलिसीने आपल्याला दगा दिला. त्यांच्याशी भांडण करुनही तथ्य नाही. आता आपल्याला या संकटातून बाहेर यावे यासाठी प्रयत्न करावे लागणार असेच मला वाटले. ताप कमी येवू दे म्हणून अखंड देवाचा धावा सुरुच होता. लोकमतचा पत्रकार वैभव गायकर यांच्याकडून पनवेल उपजिल्हा रुग्णालय अधिक्षक डॉ. नागनाथ एमपल्ले सर यांचा मी नंबर घेतला. मी त्यांच्याशी बोललो. सर मला गेले सहा दिवस ताप आहे. आणि मी खासगी मध्ये मेट्रो पॉलिसीकडे कोरोना टेस्ट केली आहे. रिपोर्ट अजून चार दिवस झाले आले नाही. काय करु. सर, बोलले तुम्ही काळजी करु नका. उद्या सकाळी ९ वाजता या. तुम्ही येथे संशयित वार्ड मध्ये अॅडमिट व्हा तसेच इथे परत टेस्ट करु या. सकाळी अॅब्लुलन्स घरी येण्यासाठी पनवेल पालिका उपायुक्त शिंदे साहेब यांच्याशीही बोलने करा ते बोलले. मी उपायुक्त संजय शिंदे साहेब यांच्याशी बोललो. त्यानीही तत्काळ पालिकेचे अधिकारी चिमणे यांच्याशी बोलून मला मंगळवारी सकाळी (२ जून) रोजी अॅबुलन्स पाठवत रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. त्यांनी मला दहा दिवसाची कपडे, टूथ पेस्ट, साबण, हॅण्डवॉश आदी घ्या. रिपोर्ट पॉझीटीव्ह आल्यास तुमच्यावर उपचार सुरु करावे लागतील. त्यामुळे त्या तयारीने या असे सांगत काळजी करु नका असेही उपायुक्त शिंदे साहेबांनी सांगितले. मग मी घरी बॅग भरायला सांगितली. बरे होण्याच्या तयारीनेच निघालो.

  • अखेर सायरन वाजलाच

गेले आठ दिवस आमच्या सोसायटीच्या परिसरात कोरोनाचे बरेच रुग्ण आढळले होते. त्यामुळे रुग्णवाहिकेचा सायरन वाजला की मनात एक वेगळीच भिती होती. २ जून रोजी सकाळी मला नेण्यासाठी रुग्णवाहिका येईल असे कधी वाटले नव्हते. पण संकट येतात जातात. आता घाबरायचे नाही. आणि मी बॅग घेवून उतरलो. सोसायटीच्या गेटवर मला आधार देण्यासाठी सोसायटीचे सचिव विष्णू शिंदे, खजिनदार जगदीश रेवाळे आले होते. त्यांनी रुग्णवाहिकेत बसवले. हात करुन आधार दिला. रुग्णवाहिका अखेर सायरन वाजवत रुग्णालयात घेवून जात होती. रस्त्यावरील प्रत्येक माणूस पहात होता. बघत होतो. माझ्या अंगात ताप सकाळीच होता. टॅबलेट घेतली होती. रुग्णवाहिकेत बसल्यानंतर मला डबडबून घाम आला होता. ओला चिंब झालो. रुमालही घामाने भिजला होता. ही बरे होण्याची लक्षणे की भितीपोटी होत आहे असे वाटले. रस्ता मोकळा, त्यामुळे मी १२ मिनिटात रुग्णालयात पोहचलो. त्यावेळी सकाळचे १०.२० झाले होते. रुग्णालयाची पायरी चढतानाच देवाचा धावा केला. सर्व काही सुरळीत कर अशी प्रार्थना केली. संशयित ओपीडीत जावून डॉ. एमपल्ले सरांचे नाव सांगितले. डॉक्टरांनी सर्व माहिती मला होत असलेला त्रास. कधीपासून ताप, किती असतो. तो कधी येतो सर्व काही आदी माहिती घेतली. ११ वाजता संशयित वार्ड मध्ये दाखल केले. त्यांनतर मला एमपल्ले सर स्वतः भेटायला आले. त्यांनी काही आता काळजी करु नका आता रुग्णालयात आला आहेत. इथे परत टेस्ट केली. त्यानंतर १२.३० वाजता माझी पुन्हा रुग्णालयाने कोरोना टेस्ट केली. तो रिपोर्ट शेवटपर्यंत आलाच नाही. दोन वाजता, डाळ, भात, दोन भाजी असे जेवण आले. तापामुळे जेवण जातच नव्हते. सर्व तोंड कडू झाले. कसेतरी दोन घास खाल्ले. त्यांनी दिलेल्या टॅबलेट खाल्या आणि झोपलो. अनेक प्रश्न सतत घोंगावत होते. नको ते विचार डोक्यात शिरत होते. टेस्ट काय येते ही चिंताच होती. या विचारात कधी मला झोप लागली कळले नाही. ४.३० वाजता मी उठलो. पाच वाजता चहा आला. ताप थोडा कमी होता. घाम खूप जात होता. त्यामुळे अंगात थकवा होताच. सात वाजता संध्याकाळचे जेवण आले. भूक नव्हतीच. पण पुन्हा कसेतरी डाळ भात खाला. तोपर्यंत नर्सनी टॅबलेट आणून दिल्या. त्या काळात गावी घरातून आणि सोसायटीतील काही जण ज्यांना माहित झाले ते कॉल करतच होते. ८.३० वाजता बेडवर तसाच फॅनकडे नजर ठेवत पडून होतो. तो पर्यंत 
मोबाईलची एसएमएस वाजला. मला वाटलेच रिपोर्ट आला वाटते. त्यानंतर मेलही आला. तो एसएमएस आणि मेल मेट्रोपॉलिसीच्या रिपोर्टचाच होता त्यावेळी रात्रीचे ८.३३ झाले होते.
  • मी कोरोना पॉझिटिव्ह

असलेला ताप हा व्हायरल आहे. तुला कोरोना नाही होणार, दुसरा कसला तरी ताप असेल काळजी करु नको. रिपोर्ट निगेटीव्ह येतील हे अनेकांचे समजूतीचे बोल. या समजूतीच्या शब्दामुळेच मी तापाची आठ दिवस सहन केली. शब्दाचा आधार हा किती दणकट असतो हे त्याच काळात कळले. अनेकांचा शब्द आजारपणाला लढा देण्यासाठी प्रवृत्त करत होते. तेच अनेकांचे शब्द मात्र रिपोर्टमधील SARS-COV-2 DETECTED या शब्दांनी सर्व मागे पडले आणि मला अखेर कोरोना झाल्याचे मंगळवारी २ जून रात्री ८.३४. मि. कळले. मी बेडवर गप्प शांत झालो. अगोदरच सर्व विचार करुन मी अगदी मन घट्ट केले होते. मी एकदाच वर पाहिले का कुणास ठाऊक आता लढा द्यायला हवे. मी तातडीने रिपोर्ट रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. यमपल्ले सर, माझा भाऊ  बाळासाहेब आणि साडू प्रकाश यांना पाठवला कारण तेच पाठपुरावा गेली चार दिवस रिपोर्ट तातडीने मिळावा यासाठी प्रयत्न करत होते. डॉ. यमपल्ले सरांना कॉल केला. सर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आपल्याला पाठवला आहे. ते मला म्हणाले पवन काही काळजी करु नका तुम्हाला कोविड वार्ड मध्ये लगेच शिप्ट करुन उपचार चालू करु. टेन्शन अजिबात घेवू नका. यामुळे अगदीच धीर आला. त्या काळात तो रिपोर्ट घरी समजला. मी तर रुग्णालायत आहे. पण पुढील भिती मुलग्याची आणि मिसेसची होती. कारण मला सात दिवस ताप होता. मी घरातच होतो. त्यामुळे तोच विचार वारंवार येत होता. पवन.. म्हणून जोरात आवाज आला. तर नर्स होत्या. तुम्हाला आता वरच्या वार्डमध्ये शिप्ट केले आहे. जेवण झाले का? मी म्हटले हो. आणि बॅग उचलली. रात्री ९ वाजता मी संशयित वॉर्डातून पॉझिटिव्ह वॉर्डात पहिल्या माळ्यावर दाखल झालो. इथला प्रवेश काही वेळेसाठी शांत करणारा. सर्व लाईट बंद होते. कोपर्यातील एक ट्युब मात्र सुरु होती. वार्ड क्रमांक २९ सलग ओळीने तीन लाइनमध्ये १२ बेड होते. त्यापैकी केवळ दोन बेड रिकामी होते. वर फॅन बघून त्या मोकळा बेड मी ताब्यात घेतला. बेडशीट आणि चादर मला नवीन दिली, इथे वातावरण खूपच वेगळे होत. काहीजण खोकत होते. कुणी जागे होते. बरे वाटत असलेले अनेकजण मोबाईल मध्ये डोके घालून बसले होते. ७५ वर्षाचे घनश्याम (नंतर नाव कळाले) माझ्या बेडच्या पलिकडे एक बेड त्यानंतर ते होते. ७५ वर्षाचा रुग्ण, धड चालता येत नव्हते. पाय ओढत बाथरुमला जाताना तो वार्डमध्ये मी पहिला रुग्ण पाहिला. मी बेडवर सर्व अंथरुन सारखे करत माझी बॅग खाली ठेवली. थोडावेळ बेडवर बसलो. तर तेच घनश्याम आजोबा बाथरुमला जात होते. मी पाहिले. माझे वय ३९. मला कसला इतर आजार नाही. की कोणते व्यसन नाही. पण मी का घाबरतोय. तो पाय ओढत जाणारा माणूस ७५ वर्षाचा तरुण बघ तोंड देतोय. इतकं त्या माणसाने मला कोरोनाची भिती घालवण्यासाठी कोविड वार्ड मध्ये दाखल झाल्यावर पहिल्याच दोन तासात जिद्द तयार केली. रात्री १०.३० वाजता नर्सने माझ्या नावाने मला हाक मारली. चहाच्या कागदी कपात पातळ औषध हातावर ठेवत. जेवण झाले का? मी म्हटले हो. हे घ्या आणि झोपा. तुम्हाला खाली वार्डमध्येच टॅबलेट दिल्या आहेत ना. मी म्‍हटले त्या मी घेतल्या ८ वाजता. ओके काळजी घ्या म्हणत त्या नर्स निघून गेल्या.रुग्णालयातील पहिला दिवस. ३ जून. त्याच दिवशी वादळ होते. मला सकाळपासून डोस चालू केले. सकासकाळीच अंगात खूप तापच होता. बाहेर वादळ सुरु होते. रुग्णालयातील लाईट वादळामुळे ये-जा करत होती. जनरेटरवर फॅन चालू होते. ते पण कधी कधी बंद होते. याच काळात माझ्या शरिरातही तापाला शह देण्यासाठी वादळ होते. खूप घाम आणि अस्वस्थता ही सुरुच होती. डोळ्यात टॅबलेटमुळे आलेली झोप, मोडून पडलेले अंग, तहाण नाही की भूक अशीच अवस्था शरीराची झाली होती. अशातच पहिला दिवस कधी संपला हे कळलेच नाही. गेले काही दिवस तापामुळे जेवण जात नव्हते. जेवण कर ताकद येईल बरे वाटेल असे अनेकजण सांगायचे. जेवण जात नव्हतेच डोळे बंद करुन पाणी पित घास गिळत होतो. मला बरे वाटावे लवकर यासाठी ही धडपड होती. दुसर्या दिवशीही वादळ होते. ताप होताच. तिसर्या दिवशी आजूबाजूच्या 
रुग्णांशी काही प्रमाणात ओळख होत होती. तिथल्या लोकांबद्दल हळुहळू खूपच आपुलकी वाटत जात होती. गुरुवारी डोस पूर्ण झाले आणि शुक्रवारी मला थोडे बरे वाटू लागले. चार घास पोटात जात होते. तापही कमी झाला होता. घामाच्या धारा मात्र सतत चालूच होत्या. या काळात मी अनेक देवांचा धावा केला. त्याचबरोबर माझ्याजवळ तीन पुस्तके होती. ती वाचून काढली. कधी वेळ घालवायचा म्हणून मोबाईल. १२ जणांच्या वार्ड मध्ये दररोज एक दोन रुग्ण नव्याने यायचे तर चार जण बरे होवून जात होते. अनेकांची कहाणी वेगवेगळी असायची. कुणी सरकारी नोकरदार तर कोणी मुंबईला कामाला जाणारा तर कुणाला घरी एकाला झाला होता म्हणून त्याला लागण झालेली. प्रत्येक रुग्णाची कहाणी वेगळीच. कुणी खूप घाबरलेला तर कुणी बिंदास्त. प्रत्येकाला हसून नमस्कार करणे हेच मी कर्तव्य मानले. त्यामुळे समोरच्यालाही बरे वाटत होते. दररोज जेवण होतेच. कधी एक केळ आणि काही वेळा बिस्कीट, कोरोनाशी सामना करण्यासाठी मला जाताना शिंदे 
आणि रुग्णालयाच्या गेटवर येवून चंदन शिरवाळे सर यांनी दिलेले सफरचंदही उपयोगी झाले. घशातून काही उतरत नव्हते. त्यावेळी सफरचंद बारीक करुन खाल्ले. मी गरम पाणी किंवा हळद मात्र दररोज सकाळ संध्याकाळ पित होतो. भाचा राहुल, रोहित मी जेवलो की नाही याची दररोज चौकशी करत होते. पण मी आजारी आहे. ही बातमी मात्र कुणालाच गावी माहित नव्हती. गावी घरात आई बहिणीने रडून रात्र काढल्या. व्हिडोओ कॉलवर मी दिसलो की आईच्या डोळ्यातून धारा लागायच्या. मला कोरोना झाला आहे. हे इकडचे तिकडे होवू दिले नाही. आजारपणात वेदना असतात त्याला उपाय म्हणून मेडिसिन तरी असतात. पण घरातील कोण आजारी असले की मात्र त्या वेदना मात्र घरात असलेल्या प्रत्येकाला रात्र रात्र  झोप येत नाही. तीच अवस्था माझ्या आजारपणात अनेकांची झाली होती. मिसेस रेश्मा, दादा (बाळासाहेब), वहिनी माया, आई, बहिण (शोभा गीता), भाचे राहुल, रोहित, सौरु, दाजी राजाराम, साडू (प्रकाश, संतोष), मेहुण्या (ललिता, रेणूका), मेहुणा सुशांत, तेजस्वी, सोसायटीतील अध्यक्ष चौगुले फॅमिली, सचिव शिंदे ऑल फॅमिली, रेवाळे फॅमिली, किंजाळकर, चौधरी व भागडे यांच्या फॅमिली, मित्र पंकज बाबर, ऑफीसमधील कार्यकारी संपादक गिरधारी सर, नाईक सर, संजय कदम सर, दिलीप सपाटे सर, उदय तानपाठक सर, चंदन शिरवाळे सर, चेतन, सुरेखा आदी मंडळीनी अनेक बाजूंनी आधार दिला. संजीव भागवत, नीरज, तेजस, सौरभ, विनायक, मनिषा फाळके, राणे मॅडम ही बीटवर सोबत काम करणारे पत्रकार, विद्यापीठ सिनेट सदस्य वैभव थोरात, सुधाकर तांबोळी त्याचबरोबर शिक्षक संघटनेचे जालींदर सरोदे, लालबागचा राजा मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, भादवणचे काका, ढवळे गणपत मामा आदींनीही दररोज कॉल करत आधार दिला. सगळेच काळजीपोटी फोन करत होते. अनेक सल्ले देत होते. अनेकदा नेमके करु काय म्हणत मला कॉलही घ्यायची भिती वाटायची. काहीही झालं तरी या परिस्थितीला तोंड द्यायचे मनात निश्चय केला. रुग्णालायत योगा-प्राणायमला करा असेही सांगितले. तेही चालू केले. भाचा राहुल आणि रोहितने शेतातील अनेक त्या काळात फोटो पाठवले. की फोटो पाहून मी आजारपण विसरुन जावू दे. मला बरे वाटू दे. मंदिरात जावून राहुल व्हिडोओ कॉल करायचा. मामा देवाचे दर्शन घ्या सांगायचा असे करत रुग्णालयातील दहा दिवसापैकी एक एक दिवस कमी होत होता.
  • रिपोर्ट निगेटीव्ह आले

माझा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने मुलाची आणि मिसेसचा टेस्ट करणे भाग होते. पण त्यांना काहीच त्रास नसला तरी टेस्ट ही करावी लागणार होती. सात दिवस सलग मला ताप येत होता. पण मी त्या काळात मास्कही वापरला नाही. मला हव नको ते मिसेस पहात होती. मुलग्याला मात्र लांब ठेवले होते. दोन दिवसाच्या वादळामुळे त्यांची टेस्ट दोन दिवस लांबली. शुक्रवारी (५ जून) वटपौणिमा होती. त्यांना पनवेल जिल्हा रुग्णालायत बोलवले आणि टेस्ट केल्या. सोमवार (८ जून) रोजी रुग्णालयात माझा ताप कमी झाला होता. मला बरे वाटू लागले होते. तो दिलासादायक दिवस होता. त्या दिवशी मिसेस आणि मुलाचाही टेस्ट रिपोर्टही येणार होता. मला भिती होती ती की मला झाला. त्यांना काय होईल यामुळे दडपण होते. ज्या मॅडमनी स्वॅबसाठी बोलवले होते. त्या श्वेता मॅडमना मी दुपारी १२.४८ वाजता मी कॉल केला. मी पवन बोलतोय मॅडम, पवन बोलताय ना.. अहो मी तुम्हालाच कॉल करणार होते. देवांशू आणि रेश्मा यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. मी अगदी समाधानाने देवाचे हात जोडले. मग सर्वांना सांगितले. असंख्य प्रश्नांनी डोकं गेली काही दिवस गरगरत होतं. त्यामधील एक प्रश्न निकामी झाला. मग मी तिथेच ठरवले की, आता ताण घ्यायचा नाही सर्व काही चांगले होईल.
..
  • अखेर कोरोनाला हरवले..

मिसेस आणि मुलाचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने मनावरच ८० टक्के ओझे कमी झालेले होते. प्रत्येकाची एक भावना असते. आपल्याला काही झाले तरी चालेल पण घरच्यांना नको तीच भावना माझी पण होती. 14 दिवस माझ्या आजारपणामुळे घरातच‌ त्यांना क्वॉरंटाईन व्हावे लागले. सोसायटीतील कशी वागतील. इतर कसे वागतील हे मनाला बोचत असतेच, पण तसे मला माझ्या सोसायटीत माझ्या कुटुंबाला जाणवू दिले नाही. मला पूर्ण बरे वाटू लागले. तापही पूर्ण कमी होत नाहिसा झाला. पाचव्या दिवशी मला पूर्ण बरे वाटले. पण दहा दिवस रुग्णालयातच राहावे लागणार होते. बुधवारी चेकअप साठी आलेल्या डॉक्टर मॅडमनी सांगितले की, पवन गुरुवारी तुम्हाला डिस्चार्ज आहे. पण तुम्हाला १८ जून पर्यंत घरीच थांबावे लागेल. घरात वावरताना काळजी घ्यावी लागेल. मास्क वापरावा लागेल. यावेळी थोडा मी भावनाविश झालो. आपण आजारी पडलो. बरे झालो. अनेकांचे पाठबळ, देवांची कृपा, आशीर्वाद, बर्याच जणांनी दिलेला धीर यामुळे मी कोरोनाला हरवले. ११ जून रोजी रुग्णालयात दुपारी जेवण झाले, माझ्या हातावर शिक्का मारला. मिसेस आणि मुलाचे रिपोर्टही हाती दिले. माझे डिस्चार्ज कार्डही दिले आणि माझा वार्ड क्रमांक २९ ने टाळ्या वाजवत निरोप दिला. मीही तुमच्यासारखाच 
आलो होतो. तुम्ही पण सर्व बरे व्हाल. असे सांगत सर्वाचा निरोप घेतला. पुन्हा टाळ्या वाजल्या. आणि मी रुग्णालायत बाहेर उभे असलेल्या अॅब्युलन्स मध्ये जावून बसलो. माझ्याबरोबर आणखी एक रुग्ण होता. त्याला पनवेलमध्ये सोडले. सोसायटीच्या बाहेर मी आल्यानंतर सोसायटीमधील अनेकजण स्वागत करण्यासाठी उभे होते. स्वागत झाले. घरी आलो. त्यानंतर १८ जून पर्यंत मी क्वॉरंटाईन काळ पूर्ण केला. आलो त्याच दिवशी अनेक विचार मनात नको म्हणून ऑफीसचे काम सुरु केले. बातम्या देण्यास सुरुवात केली. तुमच्या कृपेने मी आता बरा झालो. मी अखेर कोरोनाला हरवले हेच सांगावे लागेल.

-पवन होन्याळकर

रविवार, २१ जून, २०२०

‘फादर्स डे’

‘फादर्स डे’



रविवारी संपूर्ण जगात पितृ दिन अर्थात ‘फादर्स डे’ साजरा केला जात आहे. संपूर्ण आयुष्य स्वत:साठी नव्हे तर कुटुंबासाठी खर्ची घालणाऱ्या वडिलांना सलाम करणारा हा दिवस...पण माझ्यासाठी तर हा खूप वेदना देणारा असाच.. माझे वडील  अण्णा जाऊन  6 वर्ष झाली.  



18 जून 2014 अण्णांना जावून सहा वर्ष झाले... असा एकही दिवस गेला नाही की, अण्णांची आठवण आली नाही. अण्णांना कॅन्सर झाल्याचे त्या वर्षी जानेवारीमध्ये कळले.. त्याच्या या आजाराने अवघे घरच हादरुन गेले. सहा महिन्यातच त्यांच्यावर परळ येथील टाटा मध्ये त्यानंतर कोल्हापूरमख्ये खाजगी रुग्णालय असा प्रवास करीत उपचार झाले. पण यश मिळाले नाही आणि अवघ्या सहा महिन्यात अण्णा गेले. आई एकटी पडली. सारा संसार उघडा पडला, आमच्या कुटुंबासोबत आमचे शेतही पोरके झाले..एक दिवस कधी न घरात राहणारा, नेहमी शेतात काबाडकष्ट करत राहणारा माणूस आमच्यातून निघून गेला. वय वर्ष अगदी 65. ते निघून जाण्याचे वय न्हवते.. अजून।काही वर्षे साथ द्यायला हवी होती. पण तसे झाले नाही.
आमच्या कुटूंबातील मी शेंडेफळ,माझ्या अगोदर भाऊ दादा (बाळासाहेब), मोठ्या दोन बहिणी (शोभा आणि गीता) आणि आई हे आमचे पाहिले कुटुंब. आता त्यात सुना (माया,रेश्मा)नातवंडे जावई (राजाराम)कुटूंबाचा मोठा विस्तार झाला, रोहित, राहुल, सौरभ, अथर्व, देवांशू या पाच नातवांत राहणारा माणूस मात्र अथर्व, देवांशू मुले मोठी होण्याअगोदर गेले, याची खंत अजून मनाला बोचते..
जाताना अण्णा मला न भेटताच गेले.. हे अजूनही माझ्या मनाला बोचत राहते. अण्णा आम्हाला सोडून जायच्या अगोदरच सात दिवसापूर्वी मी त्यांना निरोप घेवून मी मुंबईला आलो होतो त्यानंतर अण्णांची तब्येत कमी जास्त होत असायची, ऑपरेशन झाले होते त्यानंतरही त्यांना वेदना खूप होत्या. अगोदर दोन दिवस तब्येत खूपच खालावली, खाण पिणे सोडले, असल्याने दादा गावी गेले. त्यामुळे त्यांना तरी अण्णाचे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या अनेक आठवणी ते ठेऊन गेले. शेतात दरवर्षी काम करणारा माणूस पुढील वर्षी नसेल असे कधी वाटले नाही. संसाराचे एक चाख निखळून पडल्यानंतर तो गाडा एक चाकावर चालत नाही, पण तो गाडा एका चाकावर का असेना पण तो हाकायचे काम माझी आई करत आहे. 

अण्णा जुनी मॅट्रिक शिकलेले.अक्षर सुंदर..ते जेवनही सुदर बनवायचे, जेवण बनवण्यासाठी त्यांना परिसरातील खेड्यात मागणी असायची. शेती कामाबरोबर हे कामही ते करायचे, लग्न, साखरपुडा, बारसे आदी विविध प्रोग्राम ना त्यांना जेवण करण्यास बोलावले जायचे. आम्हाला चार भावंडाना वाढवण्यासाठी त्यांनी हॉटेल टाकले, ते उत्तम चालवले.अनेक चांगल्या, वाईट आठवणी मागे ठेवून गेले. आई वडील सोबत कायम असणे हे प्रत्येकाच्या आयुष्यात असेल असे नाही, पण काही मुल मोठी झाल्यानंतर त्यांच्याकाही
काळापर्यंत तरी त्यांची सोबत असणं खुप गरजेचे, आयुष्यच्या सुख दुःखाच्या प्रसंगी त्यांची सोबत महत्वाची असते.
अण्णा घरी कमी शेतात जास्त, अजूनही घरी गेल्यानंतर अण्णा शेतात असेल अशी कुठेतरी वाटते..पण अण्णा शेतात नाही, शेतात यावर्षी काम करणारा माणूस पुढील वर्षी नसेल असे कधी त्यावेळी वाटले नाही. उभे शेत बोडके होऊन बघत राहते, अनेक आठवणी ताज्या होऊन समोर नाचू लागतात. त्यांच्या प्रयत्नाने शेतात ट्रॅक्टर जाणारा रस्ता झाला. ज्या रस्त्यामुळे धड चालता येत न्हवते त्या वाटेत आज शेताच्या बांधावर ट्रॅक्टर जातंय, आम्हाला कधी वाटले न्हवते या शेतातील भात ट्रॅक्टरने नेऊ, पण गेली चार वर्षे शेतात ट्रॅक्टर जाते. ते त्यांनी केलेल्या प्रयत्नाने.. आशा अनेक आठवणी त्याच्या नेहमी सहवास होत राहतात.

त्यांच्या अनेक इच्छा मागे राहिल्यात.. त्या पूर्ण करण्यास ईश्वर आम्हा कुटुंबाना बळ देवो...

शुक्रवार, १९ जून, २०२०

कुलगुरु सर आणि मी..

कुलगुरु सर आणि मी..

सर.. नमस्कार... पवन बोला... काय गावाकडे आलाय का? नाही सर सहज कॉल केला. असे म्हणून गप्पांना सुरुवात व्हायची.. संजय देशमुख यांना पायउतार व्हावे लागल्यानंतर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दयानंद शिंदे यांच्याकडे मुंबई विद्यापीठाचा कारभार राज्यपाल महोदयांनी सोपवला होता. परीक्षा व निकाल सारे गोंधळाचे वातावरण त्या काळात होते. याच काळात डॉ. शिंदे यांच्याकडे मुंबई विद्यापीठाचा डोलारा सांभायला दिला. तो त्यांनी यशस्वीपणे सांभाळला देखील. त्याच काळात सरांची ओळख झाली. मुंबई विद्यापीठात मी एकदाच भेटलो. तीच भेट त्यांनी कायम ठेवली. मध्यतरी मी गावी कोल्हापूरला गेल्यानंतरही त्यांना शिवाजी विद्यापीठात भेटायला गेलो. समोर टेबलावर काम होते. तरीही खूप गप्पा मारल्या. मी कोल्हापूरचा आणि ते शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु त्यामुळे की काय सर नेहमी जवळचे वाटले.
भेटीत त्यांना मी सर मी याच विद्यापीठाचा विद्यार्थी. बीएचे प्रमाणपत्र २००३ मध्ये प्रमाणपत्र घ्यायला विद्यापीठात आलो होतो. त्यावेळी मला दिवस लागला होता.. सगळीकडे चकरा माराव्या लागल्या होत्या. आता याच विद्यापीठाच्या कुलगुरुंच्या दालनात मला येवून गप्पा मारता येतील. असे वाटले नव्हते.. त्यावेळी सर हसले होते. शासनाचे उच्च शिक्षण विभागातील काही निर्णय किचकट वाटल्यास मी सरांना विचारत होतो. सर अगदी मनमोकळ्या पणाने समजावून सांगायचे.. मला सरांनी खूप बातम्या दिल्या.. त्या छापल्या पण त्यांनी नावासाठी कधीच आग्रह केला नाही. किंवा ते मला सांगताना माझे नाव टाकत नसलास तर मी सांगतो असे ते बोलायचे.. पुढारीच्या कोल्हापूर ऑफीस मधून त्यांना कॉल गेला की ते आताच पवनचा कॉल येवून गेला असे सांगायचे. सरांचा शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरु पदावरुन कार्यकाळ संपला. पण मार्गदर्शक म्हणून संपर्क असेलच. सरांना मी एसएमएस केला. सर पाच वर्षे लवकर संपली. म्हणताच पवन आपण काम करत राहायचे दिवस कधी थांबत नाहीत.. ते आपले काम करतात आपण आपले काम करायचे असा सल्ला त्यांनी मला दिला.

राज्यात सर्वदूर ऑनलाइन शिक्षण अवघडच...